सांगलीतील वैद्यक शास्त्राची परंपरा
 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित





  हरीपुरचे रहिवासी वैद्य ग. पां. परांजपे मोठे नामांकित वैद्य. मारुतीमंदिराचे पिछाडीस असलेल्या ओवरीतील त्यांचा दवाखाना म्हणजे रोजची एक जत्राच. लहान मुलांच्या विशेषत: काविळ, मुडदूस, उदरआंकडी इत्यादी रोगांवर त्यांच्याकडे गुणकारी औषधे मिळत. ठेंगणी, गोरीपान, घार्‍या डोळयांची, स्वच्छ शुभ्र धोतर, बंडी अंगरखा परिधान केलेली त्यांची हसतमुख मूर्ती प्रत्येक रुग्णावर प्रभाव तर पाडत असेच पण त्याचबरोबर विश्वास, दिलासाही देत असे. त्यांच्यापुढील आणखी दोन पिढ्याही वैद्यक व्यवसायातच व्यग्र आहेत. याखेरीज श्री. खानापूरकर जोशी, वेलणकर हे ही वैद्यकीय करीत. वेलणकरांनी आर्युवेदिक औषधे बनवून त्यांची निरनिराळया गांवी विक्रीचीही सोय केली होती. शिकलगार समाजातील श्री. समशेरजी शिकलगार खालच्या वर्गाच्या रोग्यांचे आधारस्तंभ. त्यांच्या कुवतीप्रमाणे खूप वर्षे त्यांनी जवळपास विनामूल्य औषधोपचार केले होते. युनानी, होमिओपॅथी इत्यादी इलाज करणारे त्यावेळी कुणीही नव्हते तसेच मुस्लिम समाजातील कुणीही वैद्य नव्हते ही नमूद करण्याजोगी बाब. पाश्चात्य वैद्यकशास्त्राचा रीतसर अभ्यास करून १९०८ साली सांगली संस्धानात असिस्टंट सर्जन म्हणून रुजू होणारे पहिले डॉक्टर म्हणजे डॉ. व्ही. एन्. देसाई. कांही वर्षांनंतर मतभेद झाल्याने नोकरी सोडून १९१३-१४ पासून वखारभागात सध्याच्या पटेल चौकात त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. दवाखाना हे सेवामंदिर आहे, रोग्यास रोगमुक्त करणे हेच चिकित्सकाचे कर्तव्य. हीच परमेश्वर सेवा या भावनेने त्यांनी १९५३ साली देह ठेवेपर्यंत व्यवसाय केला. त्यांचे चिरंजीव डॉ. देवीकुमार देसाई हे सांगलीतील पहिले एम्. डी. मेडिसिनमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले. १९४८ पासून वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून, वैद्यकी हा व्यवसाय आहे, धंदा नव्हे ही जाण ठेवून ९० सालापर्यंत सतत करीत होते. नीतीयुक्त वैद्यकी कशी करता येते याचा उत्कृष्ट आदर्श वस्तुपाठच त्यांनी आपणासमोर ठेवलेला आहे. कुठलेही काम करण्यात कमीपणा न आणणारी, सार्वजनिक कामांत स्वत:स झोकून देणारी ही व्यक्ती कायमचीच आदरणीय ठरावी.